श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी
अध्याय ४०
इंद्रानें केलेला सोमयाग; त्याकरिता सर्व नाथाचें आगमन, नवनाथांचा आशिर्वाद व समारोप. १९९ ओव्या · कथासार वाचा
श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंढरीनाथा ॥पुंडलीकवरदा रुक्मिणीकांता ॥दीनबंधो अनाथनाथा ॥पुढें ग्रंथ बोलवीं
॥१॥
मागिलें अध्यायीं रसाळ वचन ॥तुवां बोलविलें कृपेंकरुन ॥स्वर्गी चरपटीनाथें जाऊन ॥इंद्राचा गर्व हरिलासे
॥२॥
हरिहरांची जिंकूनि कोटी ॥पुढे लोभाची भेटी ॥गमनकळा नारदहोटीं ॥प्राप्त झाली महाराजा
॥३॥
उपरी मनिकर्णिकेचें करुनि स्नान ॥पुढें पातले पाताळभुवन ॥घेवूनि बळीचा गौरव मान ॥वामनातें भेटला
॥४॥
भोगावतीची करुनि आंघोळी ॥पुनः पातला भूमंडळीं ॥यावरी कथा पुढें कल्होळीं ॥नवरसातें वाढी कां
॥५॥
असो आतां रमारमण ॥ग्रंथाक्षरीं बैसला येवून ॥तरी पुढें श्रोतीं सावधान ॥कथारस घ्यावा कीं
॥६॥
इंद्र चरपटीनें जिंकला ॥वैभवें मशकातुल्य केला ॥तरी तो विस्मयवान खोंचला ॥खडतरपणीं हदयांत
॥७॥
मग जो गुरु वाचस्पती ॥परम ज्ञाता सर्वमूर्ती ॥सहस्त्रनयन तयाप्रती ॥घेवूनियां बैसलासे
॥८॥
देवमंडळांत सहस्त्रनयन ॥घेवूनि बैसलासे कनकासन ॥जैसा नक्षत्रीं रोहिणीरमण ॥अति तेजें मिरवला
॥९॥
ऐशा रीती पाकशासन ॥बैसला सेवूनि सभास्थान ॥मग बृहस्पती विस्मयरत्न ॥चरपटप्रताप सांगतसें
॥१०॥
अहा वय धाकुटें सान स्वरुप ॥परी अर्कासमान थोर प्रताप ॥हरिहरादि करुनि लोप ॥स्थापूनि गेला आपुलेचि
॥११॥
तरी वाताकर्षणविद्या सबळ ॥देवदानव झाले निर्बळ ॥नाथपंथीं हें महाबळ ॥आतळलें कैसें कळेना
॥१२॥
तरी यातें करुनि उपाय ॥साध्य करावी इतुकी ठेव ॥या कर्मासी कोण लाघव ॥स्वीकारावें महाराजा
॥१३॥
कीं तयाच्या गृहाप्रती जावून ॥दास्य करावें मनोधर्मे ॥तोषवूनि सर्व कर्म ॥महीवरी मिरवावें
॥१४॥
असो यापरी यत्न करुन ॥भेट घ्यावी त्या गंवसून ॥परी ते जोगी तीव्रपणें ॥वर्तताती सर्वदा
॥१५॥
तरी उगलीच घेऊनि सदृढ भेट ॥अर्थ वदावा तयासी निकट ॥परी काय चाड आमुची अलोट ॥कार्यार्थी भीड कोणती
॥१६॥
तरी भिडेचें उपजेपण ॥उजेड पडेल दासत्वेंकरुन ॥तयामागें रानोरान ॥अपार मही हिंडावी
॥१७॥
तरी हिंडल्यानें कोणे काळीं ॥उदय पावेल कृपानव्हाळी ॥अमरपुरीची देवमंडळी ॥तेजोयुक्त होईल
॥१८॥
म्हणाल ऐसें कासयान ॥हा विपर्यास येईल घडोन ॥तरी महीं होतो पुण्यपावन ॥आसन माझें घेतसे
॥१९॥
तरी मी येथें सावधान ॥करुनि रक्षितों आपुलें आसन ॥तस्मात् अमरावती सोडून ॥जाणें नाहीं मजलागीं
॥२०॥
ऐसें बोलतां अमरपती ॥बोलता झाला वाचस्पती ॥म्हणे महाराजा नाथाप्रती ॥येथेंचि आणावे महायत्नें
॥२१॥
तरी तो यत्न म्हणशील कैसा ॥यज्ञ करावा सोमभासा ॥त्या निमित्तें नाथ राजसा ॥घेवोनि यावें स्वर्गासी
॥२२॥
मग तो येथें आल्यापाठी ॥दावूनि भक्तीची अपार कोटी ॥मोह उपजवोनि नाथापोटीं ॥कार्य साधूनि घेइजे
॥२३॥
ऐसें बोलतां तपोद्विज ॥परम तोषला अमरराज ॥उपरी म्हणे महाराज ॥कोणा पाठवूं पाचाराया
॥२४॥
यावरी बोले कचतात ॥हे महाराज अमरनाथ ॥मच्छिंद्रपिता अष्टवसूंत ॥उपरिचर नामें मिरवतसे
॥२५॥
उपरिचर जातां महीतळवटीं ॥मच्छिंद्राची घेईल भेटी ॥सांगूनि त्यातें कार्य शेवटीं ॥मग मच्छिंद्र आम्हां बोधील
॥२६॥
तरी त्यातें पाचारुन ॥कार्ययज्ञाचा वदूनि काम ॥विमानयानीं रुढ करुन ॥पाठवावा महाराजा
॥२७॥
यापरी मच्छिंद्रनाथ ॥आला असतां अमरपुरींत ॥गौरवोनि तुवां त्यातें ॥तुष्टचित्तीं मिरवावा
॥२८॥
तरी शक्ति तव सरितालोट ॥मच्छिंद्र उदधिपोट ॥संगमिता पात्र अलोट ॥प्रेमतोय भरलें असे
॥२९॥
तरी सुमुखाचें पडतां जळ ॥कार्यशुक्तिकामुक्ताफळ ॥तूतें ओपील तपोबळ ॥नवनाथ आणोनियां
॥३०॥
मग तो मुक्त अविंधविधी ॥लावी भक्तीच्या शस्त्रास्त्रसंधीं ॥मग तें रत्न कर्णविधीं ॥स्वीकारी कां महाराजा
॥३१॥
ऐसे ऐकूनि गुरुवचन ॥परम तोषला सहस्त्रनयन ॥मग रथीं मातली पाठवोन ॥उपरिचरा पाचारी
॥३२॥
उपरिचर येतां वदे त्यातें ॥म्हणे महाराजा कामना मनांत ॥उदेली करुं सोममखातें ॥पूर्ण करीं आतां तूं
॥३३॥
तरी विमानयानीं करोनि आरोहण ॥जाऊनियां मच्छिंद्रनंदन ॥उपरी त्यातें सवें घेऊन ॥जावें नवनाथमेळीं
॥३४॥
मग ते आर्या भावार्थित ॥मेळवोनि आणी अमरपुरींत ॥सोममखाचें सकळ कृत्य ॥तया हस्तें संपादूं
॥३५॥
अवश्य म्हणे वसुनाथ ॥तत्काळ विमानयानीं बैसत ॥बद्रिकाश्रमी मच्छिंद्रनाथ ॥लक्षूनियां पातला
॥३६॥
तों गोरक्ष धर्मनाथ ॥चौरंगी कानिफा गोपीचंद राजसुत ॥बद्रिकाश्रमी जालंधर अडबंगीनाथ ॥तीर्थस्नानीं ऐक्यमेळा झाला असे
॥३७॥
ऐशा समुदायांत मच्छिंद्रनाथें ॥अवचटपणीं देखिला ताते ॥मग उठोनि मौळी चरणातें ॥समर्पीत महाराजा
॥३८॥
मग नाथ वसु भेटून ॥बैसला सकळांमध्यें वेष्टून ॥म्लानवाणीं कार्यरत्न ॥अमरांचें सांगतसे
॥३९॥
म्हणे महाराज हो शक्रापोटीं ॥अर्थ उदेला मखकोटी ॥तरी आपण नवही जेठी ॥साह्य व्हावें कार्यार्था
॥४०॥
बहुतांपरी करुनि भाषण ॥सर्वांचे तुष्ट केलें मन ॥उपरी मच्छिंद्रातें बोधून ॥अवश्यपणीं वदविलें
॥४१॥
मग जालंदर कानिफा चौरंगी ॥मच्छिंद्र गोरक्ष अडबंगी ॥गोपीचंद रायादि अन्य जोगी ॥आरुढ झाले विमानीं
॥४२॥
गौडबंगाली हेलापट्टण ॥प्रविष्ट झालें तैं विमान ॥राव गोपीचंद मातेसी भेटून ॥समागमें घेतली
॥४३॥
उपरी विमानयानी होऊन ॥पहाते झाले वडवालग्राम तेथून ॥तेथें वटसिद्धनागनाथ पाहून ॥आरुढ केला विमानीं
॥४४॥
तेथूनि भर्तरीचें करुनि काम ॥विमान चालविती इच्छिल्या व्योमें ॥तों गौतमतीरीं नाथ उत्तम ॥जती भर्तरी अवतरला असे
॥४५॥
यापरी तीर्थ करितां महीपाठीं ॥महासिद्ध जो नाथ चरपटी ॥अवंतीसी होता ताम्रपर्णीकांठीं ॥सवें घेतला महाराजा
॥४६॥
तेणें पुण्यमान देशी विटग्राम नामानें ॥पहाते झाले विमानयानें ॥तेथें रेवणसिद्ध बोधून ॥आरुढ केला विमानीं
॥४७॥
असो नवनाथ परिवारासहित ॥ते विमानयानीं झाले स्थित ॥चौर्या ॥यशीं सिद्धांसमवेत ॥अमरपुरीं पातले
॥४८॥
विमान येतां ग्रामद्वारी ॥सामोरा आला वृत्रारी ॥परम गौरवोनि वागुत्तरीं ॥चरणांवरी लोटला
॥४९॥
सकळां करोनि नमनानमन ॥नेत सदना सहस्त्रनयन ॥आपुल्या आसनीं बैसवोन ॥षोडशोपचारें पूजिले
॥५०॥
नवनाथां पाहोनि सकळ अमर ॥मनीं संतोषले अपार ॥तेज पाहोनियां गंभीर ॥उभे तेथें ठाकलें
॥५१॥
मग हवनकृत्य मनकामना ॥वदतां झाला सकळ जनां ॥म्हणे महाराजा कवणे स्थाना ॥सिद्ध अर्थ अर्थावा
॥५२॥
मग वाचस्पति आणि मच्छिंद्रनाथ ॥म्हणती सुरवरपाळा ऐक मात ॥सिंहलद्वीपीं स्थान अदभुत ॥यज्ञ तेथें करावा
॥५३॥
अटव्य कानन आहे तुमचें ॥शीतळ छायाभरित जळाचें ॥तेथें न्यून साहित्याचें ॥पडणार नाहीं कांहींच
॥५४॥
उपरिचरन वसु गंधर्व घेऊन ॥पाहत झालें अटव्यवन ॥तेथें यज्ञसाहित्य आहुती करुन ॥यज्ञ आरंभ मांडिला
॥५५॥
दंपत्य बैसोनि सहस्त्रनयन ॥मंत्रप्रयोगीं बृहस्पती आपण ॥यज्ञ आहुती नवही जण ॥स्वाहा म्हणोनि कुंडीं टाकिती
॥५६॥
परी किलोतळेचे सीमे आंत ॥अटव्यवन होते अदभुत ॥यज्ञ होतां मीननाथ ॥मच्छिंद्रातें आठवला
॥५७॥
मग पाचारोनि उपरिचर तात ॥मच्छिंद्र म्हणे जी वसु समर्थ ॥सिंहलद्वीपीं मीननाथ ॥कवण ग्रामीं ठेविला
॥५८॥
येरु म्हणे त्याच्या ग्रामसीमेंत ॥अटव्यवन हें विख्यात विराजित ॥तरी कीलोतळेसहित मीननाथ ॥पाचारितों आतांचि
॥५९॥
मग उपरिचर वसु प्रत्यक्ष जाऊन ॥मीननाथासह कीलोतळारत्न ॥पाचारुनि एक क्षण ॥भेटी केली उभयतां
॥६०॥
परम स्नेहानें क्षण एक कांहीं ॥वाहवले मोहप्रवाही ॥उपरी दारा सुत तया ठायीं ॥मच्छिंद्रानें ठेविले
॥६१॥
चौरंगी आणि अडबंगीनाथ ॥मिरवीत बैसविले समुदायांत ॥यज्ञआहुती तयांचे हस्तें ॥स्वीकारीत महाराजा
॥६२॥
दहा नाथ यज्ञआहुती ॥प्रवाहीं चाले मच्छिंद्रजती ॥पुत्रमोह धरुनि चित्तीं ॥अभ्यासातें बैसविला
॥६३॥
अभ्यास करितां मीननाथ ॥वाचस्पती शक्रासी बोलत ॥म्हणे महाराजा यज्ञार्थ ॥तुम्ही बैसतां सरेना
॥६४॥
तरी दंपत्यार्थ उपरिचरवसु ॥बैसवोनि पहावा अर्थ सुरसु ॥ऐसे बोलतां प्राज्ञ विशेषु ॥अमरपाळ समजला
॥६५॥
मग हातींचें सोडूनि यज्ञकंकण ॥वसुहाती केलें स्थापन ॥मग न्यूनपणें बहुतां प्रार्थून ॥निजदृष्टीं विलोकी
॥६६॥
सर्व पदार्थ आणवोनि आपण ॥अंगें झिजवी शचीरमण ॥उदकपात्र सांगतां जाण ॥सिद्ध होय पुढारी
॥६७॥
खाद्य भोज्य षड्रस अन्न ॥करें आणीतसे पात्रीं वाढून ॥शेवटीं शिणले तयाचे चरण ॥निजहस्तीं चुरीतसे
॥६८॥
ऐसी सेवा करितां संपन्न ॥तुष्ट होतसे जतीचे मन ॥हदयीं भाविती यावरुन ॥प्राणसांडी करावी
॥६९॥
येरीकडे मीननाथ ॥सुतासी विद्या अभ्यासीत ॥तो समय जाणोनि सापेक्ष ॥इंद्र मयूरवेषें नटलासे
॥७०॥
निकटतरुशाखेवरती ॥विद्या अभ्यासीत गुप्तपंथीं ॥तों अकस्मात वातास्त्र जपती ॥वाताकर्षण लाधलें
॥७१॥
दैवें सर्व तपराहटी ॥सकळ लाधली हातवटी ॥उपरी वाताकर्षणविद्या पाठीं ॥वातप्रेरक अस्त्र लाधलें
॥७२॥
ऐसी विद्या होतां सघन ॥परम हरुषला सहस्त्रनयन ॥परी एक संवत्सर होतां यज्ञ ॥अभ्यासीत तंववरी
॥७३॥
असो हवनअर्पण आहुती ॥मग पावूनि पूर्ण समाप्ती ॥मग मच्छिंद्रनाथ प्राज्ञिक जती ॥अग्रपूजे बैसला
॥७४॥
मग पूजा करोनि सांगोपांग ॥उपरी दशमनाथें पूजिलें अंग ॥वस्त्रभूषणें चांग ॥देऊनिया गौरविलें
॥७५॥
सकळां बैसवोनि कनकासनीं ॥उभा राहिला जोडीनि पाणी ॥सर्वासी वदे म्लानवदनीं ॥नाथ वचन माझें परिसा
॥७६॥
मातें घडला एक अन्याय ॥परी आपण सहन करा समुदाय ॥म्यां मयूरवेष धरुनि मायें ॥अभ्यासिलें विद्येतें
॥७७॥
मीनजतीचा प्रताप गहन ॥मज सांपडलें विद्यारत्न ॥तरी आपुला वर त्यातें देऊन ॥सनाथपणीं मिरवावें
॥७८॥
ऐसें बोलतां अमरनाथ ॥सर्वासी समजलें तस्करीकृत्य ॥मग ते कोपोनि परम चित्तांत ॥शापवचन बोलताती
॥७१॥
म्हणती इंद्रा तूं कृत्रिम ॥आणिलें ठकवावया कारण ॥तरी चोरुनि घेतलें विद्यारत्न ॥निष्फळ होईल तुजलागीं
॥८०॥
ऐसें बोलता सकळ जती ॥मग उपरिचर वसु वाचस्पती ॥गौरवोनि अपार युक्तीं ॥तुष्ट केलें चित्तांत
॥८१॥
म्हणती महाराजा शापमोचन ॥पुढें बोला कांहीं वचन ॥मग ते बोलती तयाकारण ॥तप आचरावें इंद्रानें
॥८२॥
द्वादश वर्षे तप आचरितां ॥विद्या फळेल तत्त्वतां ॥परी नाथपंथी छळ न होतां ॥पदरावरी पडेल
॥८३॥
ऐसें बोलोनि सकळ जती ॥विमानारुढ झाले समस्ती ॥खाली उतरुनि महीवरती ॥नाना तीर्थे भ्रमताती
॥८४॥
ऐसें भ्रमण करितां जती ॥तीर्थे झालीं अपरिमिती ॥याउपरी कीलोतळेतें मच्छिंद्रजती ॥पुसोनिया चालिला
॥८५॥
मग तें कीलोतळेचें नमन ॥अवर्ण्य आहे अनुष्ठान ॥नेत्रीं प्रेमबिंदु आणोन ॥बोळविलें नाथासी
॥८६॥
सवें घेऊनि मीननाथ ॥विमानयानी झाले समस्त ॥खालीं उतरुनि मृत्युमहींत ॥नाना तीर्थे पाहिलीं
॥८७॥
हेलापट्टणीं मैनावती ॥पोहोंचवोनि तीर्थे हिंडती ॥तेव्हां मीननाथें तीर्थक्षितीं ॥सिद्ध तीन निर्मिले
॥८८॥
तयांचें सांगितलें पूर्वी नाम ॥आतां सांगावया नाहीं काम ॥असो सिद्धकटकासह उत्तम ॥तीर्थे करीत भ्रमताती
॥८९॥
येरीकडे अमरनाथ ॥लक्षूनियां सह्याद्रिपर्वत ॥द्वादश वरुषें तप निश्चित ॥तीव्रपणी आचरला
॥९०॥
परी तें आचरितां तीव्रपणीं ॥मंत्रप्रयोगें सोडी पाणी ॥तेणें सरिता लोट लोटोनी ॥भीमरथीतें भेटली
॥९१॥
तें मणिकर्णिकेचे जीवन ॥आणिलें होतें कमंडलू भरोन ॥परी इंद्रहस्तीं प्रवाही होऊन ॥इंद्रायणीं पडियेलें
॥९२॥
ऐसें तप करोन ॥स्वस्थानासी इंद्र जाऊन ॥उपरी नवनाथ करितां तीर्थाटन ॥बहुत दिवस लोटले
॥९३॥
शके सत्राशें दहापर्यंत ॥प्रकटरुपें मिरवले नाथ ॥मग येऊनि आपुले स्थानांत ॥गुप्तरुपें राहिले
॥९४॥
मठींत राहिला कानिफाजती ॥उपरी मछिंद्रासी मायबाप म्हणती ॥जानपीर जो जालंदर जती ॥गर्भागिरीं नांदतसे
॥९५॥
त्याहूनि खालतां गैबीपीर ॥तो गहनीनाथ परम सुंदर ॥वडवानळ ग्रामीं समाधिपर ॥नागनाथ असे कीं
॥९६॥
वीटग्रामीं मानवदेशांत ॥तेथें राहिले रेवणनाथ ॥चरपट चौरंगी अडबंगी तीर्थ ॥गुप्त अद्यापि करिताती
॥९७॥
भर्तरी राहिला पाताळभुवनीं ॥मीननाथ गेला स्वर्गालागोनी ॥गिरनार पर्वतीं गोरक्षमुनी ॥दत्ताश्रमीं राहिला
॥९८॥
गोपीचंद आणि धर्मनाथ ॥ते स्वसामर्थ्ये गेले वैकुंठांत ॥विमान पाठवोनि मैनावतीतें ॥घेऊनि विष्णु गेलासे
॥९९॥
पुढें चौर्याायशीं सिद्धांपासून ॥नाथपंथ मिरवला अतिसामर्थ्यानें ॥येथूनि चरित्र झालें संपूर्ण ॥सर्व नाथांचें महाराजा
॥१००॥
तरी आतां सांगतों मुळापासून ॥कथा वर्तली कवण ॥प्रथमाध्यायीं गणपतिस्तवन ॥सुंदरपणीं मिरवले
॥१०१॥
उपरी सांगूनि रेताक्षिती ॥आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती ॥तो बद्रिकाश्रमाप्रती ॥तपालागीं बैसला
॥१०२॥
या प्रसंगाचें श्रवण पठण ॥नित्य करितां भावेंकरुन ॥तरी समंधबाधा घरांतून ॥जाईल वासूनी महाराजा
॥१०३॥
द्वितीय अध्यायीं अत्रिनंदन ॥विद्यार्णव केला अनुग्रह देऊन ॥उपरी नागपत्रीं अश्वत्थी जाऊन ॥सिद्धयर्थकळा साधिली
॥१०४॥
तो अध्याय करितां नित्य पठण ॥अपार धन लाभेल संसारी जाण ॥विजयलक्ष्मी पाठीं बैसून ॥करील हरण दरिद्र
॥१०५॥
तृतीय अध्यायीं मच्छिंद्र मारुती ॥युद्धा प्रवर्तले श्वेतक्षितीं ॥युद्ध करुनि उपरांतीं ॥ऐक्यचित्त झालें असे
॥१०६॥
याचें झालिया पठण ॥शत्रु होतील क्षीण ॥मुष्टिविद्यासाधन ॥तया होत सर्वथा
॥१०७॥
मुष्टिबाधा झाली असोन ॥अपकार होईल तियेने ॥मुर्तिमंत मारुती करोनि रक्षण ॥राहे तया घरीं सर्वदा
॥१०८॥
चतुर्थ अध्यायीं वदली कथा ॥अष्टभैरव चामुंडा समस्ता ॥रणीं जिंकूनि वसुसुता ॥ज्वालामुखी भेटली
॥१०९॥
तो अध्याय नित्यपठण करितां ॥चुकेल कपटाची बंधनव्यथा ॥शत्रु पराभवोनि सर्वथा ॥निरंतर शांति मिरवेल
॥११०॥
पांचवे अध्यायींचे कथन ॥भूतें घेतलीं प्रसन्न करुन ॥अष्टपती जिंकून ॥विजयी झाला मच्छिंद्र
॥१११॥
ती कथा नित्य करिता पठण ॥भूतसंचार नोहे त्या घराकारण ॥आले असतां जाती सोडोन ॥परम त्रासेंकरोनियां
॥११२॥
सहाव्या अध्यायांत ॥शिवअस्त्र कालिका मच्छिंद्रनाथ ॥युद्ध करुनि प्रसन्नचित्त ॥वश्य झालीं अस्त्रें ती
॥११३॥
तो अध्याय नित्य करितां पठण ॥शत्रूलागीं पडेल मोहन ॥निष्कपट तो करुनि मन ॥किंकर होईल द्वारींचा
॥११४॥
सातव्या अध्यायीं अपूर्व कथा ॥जिंकूनि वीरभद्र केली ऐक्यता ॥उपरी स्वर्गापासाव मच्छिंद्रनाथा ॥इच्छेसमान झालीसे
॥११५॥
ती कथा नित्य गातां ऐकतां ॥लिप्त नोहे त्रौर्यापयशींची व्यथा ॥झाली असेल मिटेल सर्वथा ॥चिंत्ता व्यथा हरतील
॥११६॥
जखीणभयापासुनी ॥त्वरित मुक्त होईल जनीं ॥एक मंडळ त्रिकालीं अभ्यासूनी ॥फलप्राप्ति घेइजे
॥११७॥
आठव अध्यायीं सकळ कथन ॥पाशुपतरायासी रामदर्शन ॥रणीं मित्रराज जिंकोन ॥केला प्रसन्न विद्येसीं
॥११८॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥आपुला सखा देशावरता ॥तो गृहासी येऊन भेटेल तत्त्वतां ॥चिंताव्यथा हरेल कीं
॥११९॥
नववे अध्यायीं कथन ॥गोरक्षाचा होऊनि जन्म ॥उपरी सेवूनि बद्रिकाश्रम ॥विद्यार्णव झालासें
॥१२०॥
तो अध्याय नित्य गातां ऐकतां ॥साधेल विद्या इच्छिल्या अर्था ॥ब्रह्मज्ञान रसायण कविता ॥चवदा विद्या करोनि राहे
॥१२१॥
दशम अध्यायीचें कथन ॥स्त्रीदेशीं मच्छिंद्रनंदन ॥अंजनीसुतअर्थी पाठवोन ॥अर्थ किलोतळेचे पुरविले
॥१२२॥
एकांतीं बैसूनि अनुष्ठान ॥संजीवनी पाठ करी गौरनंदन ॥गहिनीनाथाचा झाला जन्म ॥कर्दमपुतळा करितां तो
॥१२३॥
तो अध्याय करितां पठण ॥स्त्रियांचे दोष जातील कपटपण ॥फळे वाचतील होतां जाण ॥जगीं संतती मिरवेल
॥१२४॥
उपरी गृहद्रव्याच्या यज्ञांत ॥उदय पावला जालिंदरनाथ ॥तो एकादश अध्याय पठण करितां नित्य ॥अग्निपीडा होईना
॥१२५॥
आणि जयाचे धवळारात ॥पूर्वीचा कांहीं दोष असत ॥तो जाऊनि संपत्तिविशेषातें ॥संततीसह भोगील कीं
॥१२६॥
बाराव्यांत हें कथन ॥जालिंदरें गुरु केला अत्रिनंदन ॥उपरी कानिफाचा होऊनि जन्म ॥विटंबिले देवांसी
॥१२७॥
तो अध्याय करितां पठण ॥क्षोभ न पावे कोणी देवता जाण ॥क्षोभित असल्या होतील शमन ॥सुख सर्व त्याचि देती
॥१२८॥
तेराव्या अध्यायांत ॥मैनावतीतें प्रसन्न नाथ ॥होऊनि केलें अचल सनाथ ॥ब्रह्मरुपीं आगळी
॥१२९॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥स्त्रीहत्येचें दोष सघन ॥त्यांचे होऊनि सकळ निरसन ॥उद्धरील पूर्वजां चतुर्दश
॥१३०॥
चतुर्दश अध्यायीं कथन ॥गर्तेत जालिंदर गोपीचंदानें ॥स्त्रीबोलें घातले नेऊन ॥गुप्त निशीमाझारी
॥१३१॥
तो अध्याय पठण करितां ॥असेल बंध कारागृहीं व्यथा ॥तरी त्याची होईल मुक्तता ॥निर्दोष जनीं वर्तेल
॥१३२॥
पंचदशांत सुढाळ कथन ॥कानिफामारुतीचे युद्धकंदन ॥उपरी स्त्रीराज्यांत जाऊन ॥आतिथ्य पूर्ण भोगिलें
॥१३३॥
तो अध्याय गातां ऐकता नित्य ॥घरचे दारचे कलह नित्यकृत्य ॥शांति पावोनि सर्व सुखांत ॥निर्भयपणें नांदेल
॥१३४॥
सोळावे अध्यायांत ॥कानिफा भेटला गोपीचंदातें ॥तरी तो अध्याय वाचितां नित्यानित्य ॥दुःस्वप्नातें नाशील
॥१३५॥
सप्तदश अध्यायीं कथन ॥जालिंदर काढिला गर्तेतून ॥उपरी नाथाची दीक्षा घेऊन ॥गोपीचंदें अर्चिला
॥१३६॥
तोचि अध्याय पठण करितां ॥योग साधेल योग आचरतां ॥दुष्टबुद्धि जाईल सर्वथा ॥सुपंथपंथा लागेल तो
॥१३७॥
अष्टादश अध्यायीं कथन ॥बद्रिकाश्रमी गोपीचंद जाऊन ॥तपःपूर्ण भगिनी उठवोन ॥तीव्रपणीं आचरला
॥१३८॥
तो अध्याय नित्य पठण करितां ॥ब्रह्महत्या नासेल सर्वथा ॥पूर्वज कुंभीपाकीं असतां ॥सुटका होईल तयांची
॥१३९॥
एकोणिसाव्यात गोरक्षाकारण ॥भेटला मारुति श्रीरामप्रीतीने ॥तरी तो अध्याय करितां पठण ॥तया मोक्षार्थ साधेल कां
॥१४०॥
तिसाव्यात अदभुत कथन ॥श्रीमाच्छिंद्रा भेटीचे कारण ॥गोरक्ष स्त्रीराज्यांत जाऊन ॥स्नेहसंपन्न जाहला
॥१४१॥
तो अध्याय पठण करितां गोड ॥लागलें असेल अत्यंत वेड ॥तरी ती चेष्टा जाऊनि धड ॥होऊनि प्रपंच आचरेल
॥१४२॥
एकविसाव्यांत स्त्रीराज्यांतून ॥मच्छिंद्रासी काढिलें गोरक्षनंदनें ॥नानापरी बोधूनि मन ॥दुष्टकर्मातें निवटिलें
॥१४३॥
तो नित्य अध्याय पठण करितां ॥नासेल बहुजन्माची गोहत्या ॥निष्कलंक होऊनि चित्ता ॥तपोलोकीं मिरवेल
॥१४४॥
बाविसाव्यांत सोरटीग्रामी ॥गोरक्षें मीननाथा मारोनी ॥पुन्हां उठविला मंत्रेंकरोनी ॥मच्छिंद्रमोहेंकरुनियां
॥१४५॥
तरी तो अध्याय नित्य पठण करितां ॥पुत्रांर्थिया पुत्र तत्त्वतां ॥तो होईल विद्यावंत ॥विद्वज्जना मान्य कीं
॥१४६॥
तेविसाव्यांत रसाळ कथन ॥मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन ॥सुवर्णविटेकरितां सुवर्ण ॥गर्भगिरि केला असे
॥१४७॥
आणिक केला तेथें उत्सव ॥तरी तो अध्याय पठण नित्य भावे ॥करितां घरीं सुवर्ण नव ॥अखंड राहे भरोनि
॥१४८॥
चोविसाव्यांत भर्तरीनाथ ॥जन्मोनि आला आवंतिकेंत ॥तरी तो अध्याय पठण करितां नित्य ॥बाळहत्या नासेल
॥१४९॥
बाळहत्या जन्मांतरी ॥तेणें समस्त वांझ होती नारी ॥तरी ते नासेल संसारीं ॥सुखी होऊनि बाळ वांचे
॥१५०॥
पंचविसाव्यात गंधर्व सुरोचन ॥रासभ झाला शापेंकरुन ॥तरी तो अध्याय केलिया पठण ॥शापवचन बाधेना
॥१५१॥
आणि मानवाविण दुसरा जन्म ॥होणार नाही तयाकारण ॥आरोग्य काया पतिव्रता कामिन ॥पुत्र गुणी होईल
॥१५२॥
सव्विसावे अध्यायांत ॥गणगंधर्व झाला विक्रमसुत ॥आणि विक्रम भर्तरीसुत ॥एकचित्त ॥भेटी होऊनि राहिले
॥१५३॥
तो अध्याय करितां पठण ॥गोत्रहत्या जाति नासून ॥पोटीं पाठीं शत्रुसंतान ॥न राहे होऊनियां
॥१५४॥
सत्ताविसाव्यांत अदभुत कथन ॥राज्यपदी बैसला राव विक्रम ॥भर्तरी पिंगलेचें होऊनि लग्न ॥दत्तानुग्रह लाधला
॥१५५॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥पदच्युत पावेल पूर्वस्थान ॥गेली वस्तु पुनः परतोन ॥सांपडेल तयांची
॥१५६॥
अट्ठाविसाव्या अध्यायांत ॥पिंगलेकरितां स्मशानांत ॥विरक्त होऊनि भर्तरीनाथ ॥पूर्ण तप आचरला
॥१५७॥
तो अध्याय करितां श्रवण पठण ॥त्या भाविकाचें होईल लग्न ॥कांता लाभेल गुणवान ॥सदा रत सेवेसी
॥१५८॥
एकुणतिसावे अध्यायींचे चरित्र ॥भर्तरी होऊनि विरक्त पवित्र ॥गोरक्ष सांगती अत्रिपुत्र ॥गुरुनाथ पै केला
॥१५९॥
तो अध्याय नित्य करितां पठण ॥सुटेल क्षयरोगापासून ॥आणि त्रितापांची वार्ता जाण ॥कालत्रयीं घडेना
॥१६०॥
तिसाव्या अध्ययांत ॥जन्मला चौरंगीनाथ ॥परी तें चरित्र पठण करितां ॥तस्करी दृष्टी बंधन होय
॥१६१॥
एकतिसाव्यांत चौरंगीनाथ ॥तपा बैसला हिमालयांत ॥तरी तो अध्याय पढतां ॥कपटमंत्र न चालती
॥१६२॥
बत्तिसाव्यांत सुगम कथन ॥मच्छिंद्र त्रिविक्रमदेहीं संचरोन ॥द्वादश वर्षे राज्य करोन ॥रेवतीसी पुत्र दिधला
॥१६३॥
त्या अध्यायाचें करितां पठण ॥अयुष्य असतां देहाकारण ॥गंडांतरें करुं येतील विघ्नें ॥आपोआप टळतील कीं
॥१६४॥
तेहतिसाव्यांत गौरनंदन ॥वीरभद्राचा घेऊनि प्राण ॥मच्छिंद्रशव स्वर्गाहून ॥महीवरती उतरिलें
॥१६५॥
तरी ती कथा करितां पठण ॥धनुर्वाताचें निरसे विघ्न ॥झालेल्यातें होतां श्रवण ॥पीडा हरेल तयाची
॥१६६॥
चौतिसाव्यांत रेवणजन्म ॥होऊनि भेटला अत्रिनंदन ॥सहज सिद्धिकळा दावून ॥गेला असे महाराजा
॥१६७॥
तरी ती कथा करितां पठण ॥जाणें कोणत्याही कार्याकारण ॥तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन ॥यश घेऊन येईल तो
॥१६८॥
पस्तिसाव्यांत पूर्ण कथन ॥रेवण झाला विद्यावान ॥दत्तकृपें स्वर्गी जाऊन ॥बाळें आणिलीं विप्राचीं
॥१६९॥
तरी ती कथा करितां पठण ॥महासिद्ध येईल उदराकारण ॥बेचाळिसांचें करुनि उद्धरण ॥गातील आख्यान लोक परी
॥१७०॥
छत्तिसाव्यांत अपूर्व कथा ॥जन्म झाला वटसिद्धनाथा ॥आस्तिक ऋषि झाला ताता ॥तयाचिये मातेसी
॥१७१॥
ती कथा करितां श्रवण पठण ॥सर्पवृश्चिक दंश जयाकारण ॥झालिया विषाचें उत्तीर्ण ॥श्रवण केलिया अध्याय तो
॥१७२॥
सदतिसाव्या अध्यायांत ॥नागनाथासी गुरु झाला अत्रिसुत ॥उपरी विद्याबळें मच्छिंद्रनाथ ॥जिंकियेले भिडोनी
॥१७३॥
ती कथा करितां श्रवण पठण ॥सदना न लागे कुशीलपण ॥लागल्या त्याचें होईल बंधन ॥विद्यावंत होऊनियां
॥१७४॥
अडतिसाव्यांत चरपटीचा जन्म ॥होऊनि दत्तात्रेयें दीक्षा देऊन ॥विद्येमाजी करुनि संपन्न ॥तीर्थावली धाडिला
॥१७५॥
तरी ती कथा सुरस ॥श्रवण पठण होतां त्यास ॥हिंवताप मधुरा नवज्वरास ॥शांति होईल सर्वस्वीं
॥१७६॥
एकूणचाळिसाव्यांत कथा ॥चरपटीनें जिंकिलें अमरनाथा ॥हरिहरादि देवां समस्तां ॥स्वर्गी ख्याती लाविली
॥१७७॥
तरी तो अध्याय करितां पठण ॥तो युद्धां जातां तपोधन ॥शस्त्रबाण पावोन ॥जय घेऊन येईल कीं
॥१७८॥
यावरी चाळिसाव्यांत कथन ॥सर्व नाथांतें पाकशासन ॥स्वर्गी नेऊनि करी हवन ॥विद्यार्थिरुपें अर्थ पुरविला
॥१७९॥
तरी चाळिसावा नित्य पठण करितां ॥लाभेल सर्व इच्छिल्या अर्था ॥यश श्री ऐश्वर्य योग्यता ॥पुत्रपौत्रीं नांदेल
॥१८०॥
एकुणचाळिसांचा फलार्थ ॥तोचि प्राप्त तदर्थ ॥कीं चाळिसावा एक परिस ॥कीं कामधेनु कल्पतरु
॥१८१॥
गोरक्ष बोलतो वाचेकरुन ॥त्यातें असत्य मानील जन ॥जो निंदक यातें दावील निंदून ॥तो अधिकारी विघ्नांचा
॥१८२॥
इहलोकीं परलोकीं ॥राहणार नाहीं परम सुखी ॥निर्वश पावोनि शेवटीं वंशीं ॥पिचेल ग्रंथ निंदितां हा
॥१८३॥
अगा हा ग्रंथ नोहे भक्तिसार ॥आहे गोरक्षाचा किमयागार ॥परी पालटोनि भाषांतर ॥महाराष्ट्र अक्षरीं रेखिला
॥१८४॥
म्हणोनि श्रोते हो भाविक जन ॥सोडोनि द्या कीं निंदावचन ॥विश्वासपर स्वार होऊन ॥मोक्षमुक्काम करी कीं
॥१८५॥
तरी हा ग्रंथ संग्रह करुन ॥चमत्कार पाहावा पठण करुन ॥हे चाळीस प्रसंग मंत्रनिर्वाण ॥महासिद्धीचे असती कीं
॥१८६॥
हे चाळीस मंत्र परोपकारी ॥आहेत दुःखाची करतील बोहरी ॥तरी संग्रह करुनि उगलेचि घरी ॥ठेवा विश्वास धरुनियां
॥१८७॥
ह्या चाळीस अध्यायांत मंत्रयंत्र ॥सुखकारक असती अति पवित्र ॥दुःखदरिद्रहरण सर्वत्र ॥गोरक्षकानें निर्मिलें
॥१८८॥
पठण करितां षण्मासमिति ॥जो अध्याय ज्या कार्याप्रति ॥तें कार्य होईल निःसंशय चित्तीं ॥पठण करुनि पहावें
॥१८९॥
याउपरी वाचितां न ये जरी ॥तरी संग्रह करुनि ठेवावा घरीं ॥नित्य वंदितां नमस्कारीं ॥कार्य त्यांतचि घडेल
॥१९०॥
एक कुसुम झोंकूनि वरती ॥चला म्हणावें मम कार्याप्रति ॥नवनाथ वंदूनि उक्ति ॥नमस्कार करावा
॥१९१॥
ऐसा याचा आहे मार्ग ॥करुनि पहावा चमत्कार चांग ॥नवनाथ ओडवोनि अंग ॥कार्य तुमचें करितील कीं
॥१९२॥
तरी असो विजय संपत्ती ॥नांदो श्रोत्याच्या गृहाप्रति ॥धुंडिसुत हेंचि प्रार्थी ॥मालू नरहरी देवाते
॥१९३॥
शके सत्राशें एकेचाळीस ॥प्रमाथीनाम ज्येष्ठ मास ॥शुक्लपक्ष प्रतिपदेस ॥ग्रंथ समाप्त जाहला
॥१९४॥
तरी ओंव्या सर्व नेमस्त ॥सप्तसहस्त्र सहाशत ॥उपरी ऐसे देदीप्यवंत ॥ओंव्या मंत्र असती ह्या
॥१९५॥
अध्याय वाचावया न बनेल ज्यासी ॥तरी अध्यायांतील एक ओंवीसी ॥पठण करुनि नाथनामासी ॥कार्यकाज करावें
॥१९६॥
असो आतां बहु भाव ॥श्रोते असोत चिरंजीव ॥इहलोकीं परलोकीं ठेव ॥आनंदाची होतसे
॥१९७॥
तरी समस्त नाथांतें धुंडीसुत ॥मालू नरहरि हेंचि विनवीत ॥कीं श्रोते असोत सुखरुपवंत ॥सर्व अर्थी सर्वदा
॥१९८॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥सदा परिसोत भाविक चतुर ॥चत्वारिंशतितमाध्याय गोड हा
॥१९९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥